Thursday 17 September 2009

रघू दंडवते


रघू दंडवते गेला. सोमवारी सकाळी सतीश तांबेचा फोन आला, त्याने सांगितलं. त्यानंतर जयंत धर्माधिकारीचा एसएमएस आला. मी नाशिकला होतो. इखलाखशी चर्चा करतानाच सतीशचा फोन आला होता. त्यानंतर सतीशशी बोललो. मनोज होताच. त्याच्याबरोबर मार्केट इंटेलिजन्स द्राक्ष उत्पादकांना कसा उपयोगी पडतो त्यावर चर्चा वगैरे. मग द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन. कामातच गुंतून गेलो. रघुचं निधन झाल्याची बातमी जवळपास विसरुनच गेलो.
संगमनेरहून पुण्याला जाताना रघूची आठवण झाली. त्याची साधी, सोपी आकृती, प्रेमळ चेहेरा, बोलण्याची ढब आठवली आणि स्वतःशीच हसलो. त्याची काही वाक्यंही जशीच्या तशी आठवली. मग सतीशला फोन केला. रघूच्या आठवणी उगाळण्यासाठी चार-दोन दिवसात भेटायला हवं.
अशोक आणि रघू दोघेही सिनिक. त्यांच्या सिनिसिझममध्ये त्रागा नाही. मौज आहे. काही वर्षांपूर्वी जयंत धर्माधिकारी, नंदू धनेश्वर, संजीव साबडे, अशोक, सतीश तांबे, हेमू, मी, विजय, अरुण केळकर, मेघनाद कुलकर्णी असे काहीजण जमलो होतो. कपिल पाटील त्यावेळी "आज दिनांक" काढायचा तर निखिलचं "आपलं महानगर" सुरु होतं. नंदू निखिलची खूप तारीफ करत होता. रघु म्हणाला, कपिल आणि निखिल दोघांचेही पेपर चालले पाहिजेत. त्यांच्या पाया पडा हवं तर पण सांगा की पेपर बंद करू नका. का म्हणून विचारलं तर रघु म्हणाला, अरे तुमचं "दिनांक" बंद पडलं म्हणून तर हे भिकारचोट पेपर काढायला लागले. आता ह्यांची वर्तमानपत्रं बंद पडली तर आणखी कोणीतरी अडाणचोट पुढे येतील त्यापेक्षा हे बरे.
गप्पांच्या ओघात दिनांकचा ताळेबंद माडणं सुरुच होतं. अरुण केळकर म्हणाला, .......या एका कारणासाठी जयंतला शंभर गुन्हे माफ करायला हवेत. रघु म्हणाला ते ठिकाय. गुन्हे का माफ केले हे सांगितलंत आता ते १०० गुन्हे सांगा.
मधू (नाना) दंडवतेंवर बायपास सर्जरी झाली होती. रघुवरही झाली होती. मी नानांच्या घरी गेलो. खादीचे स्टार्चचे कपडे चढवून नाना भेटायला येणा-या लोकांशी बोलायला तयारीत बसले होते. तिथे अशोकही आला होता. नाना त्यावेळी खासदार नव्हते. त्यावेळी वर्तमानपत्रातून खासदारांच्या हक्कांबाबत काही चर्चा सुरु होती. नाना अर्थातच त्या विषयावर बोलू लागले. राज्यघटनेचे संदर्भ, आजपर्यंतचे पायंडे वगैरे सांगत। रघू एका चटईवर लेंगा-शर्ट घालून बसला होता. तो म्हणाला, अरे अशोक आमचा नाना खासदार झाल्यापासून नेहमी खासदारांच्या बाजूनेच बोलत असतो. लोकांच्या बाजूने बोलतच नाही. नानाही हसायला लागले.
रघू आणि अशोक यांच्यात एक कॉमन होतं ते म्हणजे जात, धर्म, देश, भाषा, प्रांत यांच्या अभिमानाच्या बिंदूवर ते प्रश्नचिन्ह लावत असत. शिवाजी म्हटलं की रघू म्हणायचा मराठ्यांच्या राज्यापेक्षा आमच्या नगरकडल्या मुसलमानांच्या राजवटी ब-या होत्या की. मुसलमान राजांनी लोकहिताची काय कामं केली हेही सांगायचा. महाराष्ट्राने अभिमान कोणाचा बाळगायचा, संतांचा की शिवाजीचा असा प्रश्न तो आणि अशोक करत असत. रामजन्मभूमीच्या आंदोलनाबद्दल रघू म्हणायचा, बाबरी मशिद पाडली कोणी याचा अजून छडा लागलेला नाही. भाजप, विहिंप वा रास्वसंघ कोणीच कबूल करत नाही की त्यांनी मशिद पाडली. सरकार वा न्यायालयानेही मशिद कोणी पाडली, याबद्दल काहीही मतप्रदर्शन केलेलं नाही. १९९२ साली मशिद पाडण्यात आली, त्याचं व्हिडीओ चित्रण वगैरेही आहे पण झाल्या प्रकाराला कोण जबाबदार आहे हेच अजून समजलेलं नाही, हे गौडबंगालच आहे, असं तो म्हणायचा.
रघूच्या बोलण्याची पद्धत खास होती. पुटपुटल्यासारखं तो बोलायचा. कोणताही महत्वाचा मुद्दा तो अगदी सामान्यपणे सांगायचा. त्याच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ बनवण्याची जबाबदारी अरुण कोलटकरने घेतली. संग्रहाचं नाव त्याने विचारलं तर रघू म्हणाला नावाचा आणि कवितांचा काय संबंध. उदाहरणार्थ वडलांनी माझं नाव रघू ठेवलं. माझा त्या नावाच्या अर्थाशी काही संबंध नाही। रघू अरूणलाही असा पेचात टाकायचा. वादात त्याला रस नसायचा. शेरेबाजी मात्र सतत चाललेली असायची. विजय तेंडुलकर म्हणजे गुलशन नंदासारखाच आहे, असं सहजपणे म्हणून जायचा. त्यातल्या त्यात विजयाबाई (विजया मेहता) मात्र अजून सेवादलवाली आहे, अशी पुस्ती जोडायचा. कोणतेही दाखले देताना तो म्हणायचा हे सर्व ऐकीव आहे बरं का.
रघूच्या नावावर अनेक ऐकीव गोष्टी आहेत. मुल्ला नसरुद्दीन अशा ऐकीव गोष्टींमधूनच साकार होतो. तो खरा होता की नाही, त्या पात्राचा निर्माता कोण या प्रश्नांची उत्तरं विकीपिडीयातही मिळत नाही। आपण जुन्या काळात असतो तर रघूचीही दंतकथा तयार झाली असती.

5 comments:

  1. Interesting stuff. Write more about your experiences around the country.


    Aay

    ReplyDelete
  2. arthpurna 350 shabd lihinyat tuza hatkhanda aahe. shivay maazyza mahiteet tuzyaevadha baudheek vishay dokyat baalganara maanoos viralach. tyaat sadhya tuza suru asanara swair sanchar.Ekun tu blog suru kelas hay pharach chhan zaala.amhaa lokaana aata changalachungala vaachayala milel.
    btw
    raghucha terava pudhachya shukravari yeto aahe.
    tar weekendla tyanimattane jamuya.

    ReplyDelete
  3. well worded portrait of a tangential

    but crystal clear personality.You have Clicked

    appropriate memories to capture Shri Raghu

    Dandavate in a convincing style even for an

    outsider like me. Smita gandhi.

    narration

    ReplyDelete
  4. Ever since I read about Raghu Dandavate before in an article wirrten by Mr. Patil in the Sakal, I have been curious to know more about him.... Your artilce has satified the curiosity to some extent.
    a well-written peiece.
    But still want to know more about Raghu Dandavate.

    Would like to read more about Raghu Dandavate from you.

    Shirish

    ReplyDelete